मराठवाडा

०१. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागांचा समावेश होता. त्यात मराठवाडा, तेलंगाना, कर्नाटक असे भिन्न प्रदेश भाषिक आधारावर अस्तित्वात आले.
 मराठवाड्याची कागद पत्रातील पहिली नोंद १५७० ते १६१४ या कालखंडात ‘तारीख ए फरिश्ता’ मध्ये ‘मऱ्हटवाडी’ अशी आढळते. 

०२. मुघल साम्राज्याचा दक्षिणेतील सुभेदार ‘मीर कमरुद्दीन चीन क्वीलीच खान निजाम उल मुल्क’ याने ३१ जुलै १७२४ रोजी दक्षिणेत स्वतंत्र राज्याची स्थापना केली.

याची राजधानी हैद्राबाद येथे होती. या राज्याच्या गादीवर वंशपरंपरेने होऊन गेलेल्या सत्ताधीशांना ‘निजाम’ व ‘आसफजाह’ या नावाने ओळखले जाते.

०३. निजामाचा पंतप्रधान सालारजंग पहिला याने १८७० मध्ये राज्याची नव्याने जिल्हाबंदी करून मराठी भाषिकांचा औरंगाबाद सुभा निर्माण केला व त्यास मराठवाडा असे नाव दिले. आज मराठवाडा महाराष्ट्राचा प्रादेशिक विभाग आहे.

०४. मराठवाड्याची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच भूमीत श्री मुकुंदराज चक्रधर, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबाकाका, संत नामदेव, संत एकनाथ यांसारखे संत होऊन गेले. शिवाजी महाराजांचे घराणे सुद्धा

मराठवाड्यातील वेरूळचे होते.
भारतातील १२ व महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर (वेरूळ-औरंगाबाद), वैद्यनाथ (परळी-बीड), नागनाथ (औंढा-हिंगोली) ही तीन ज्योतिर्लिंगे मराठवाड्यात आहेत. महाराष्ट्राच्या कुलदैवतांपैकी तुळजाभवानी मराठवाड्यात आहे.

मराठवाड्यातील संस्था

०१. १९२० पर्यंत मराठवाड्यात हायस्कूलची संख्या ६ होती. १९१७ मध्ये हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठ स्थापन झाले. १९२७ ला औरंगाबादला मराठवाड्यातील पहिले इंटरमेजिएट कॉलेज स्थापन झाले. राज्यात खाजगी शिक्षण संस्था व वाचनालये यावर निर्बंध होते.

०२. १९०१ साली स्थापन करण्यात आलेले परभणीतील गणेश वाचनालय हे मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय होते. त्यानंतर हिंगोली, कळमनुरी, औंढा, औसा, सेलू, मानवत, नळदुर्ग, तुळजापूर, चाकूर, लोहारा येथेही वाचनालये सुरु झाली.

१ ऑगस्ट १९२० रोजी औरंगाबादला बळवंत वाचनालय स्थापन झाले. वाघमारे हे या वाचनालयाचे प्रवर्तक होते.

०३. १९३५ च्या सुमारास स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या प्रेरणेतून २० खाजगी शाळा राष्ट्रीय भाषेतून स्थापन झाल्या. १८९१ मध्ये टिळकांनी ‘लातूर’ला पहिली जिनिंग प्रेस स्थापन केली.

०४. उर्दू भाषा ही शैक्षणिक व्यवस्थेतून राजभाषा बनली. त्यामुळे संस्थानातील इतर साहित्य, संस्कृती व भाषांची गळचेपी होऊ लागली.

या सांस्कृतिक संघर्षामुळेच साहित्य संस्थांचा जन्म झाला. १९१४-१९१५ मध्ये केशवराव कोरटकर व वामनराव नाईक यांच्या पुढाकाराने हैदराबादेत दक्षिण साहित्य संघ स्थापन झाला. सुरुवातीच्या काळात ‘विदर्भ साहित्य संघा’शी ही संस्था संलग्नित होती.

०५. १९३१ साली हैदराबादेत ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ घेण्यात आले. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे याचे अध्यक्ष होते. आ.कृ. वाघमारे यांनी ‘संजीवनी’ साप्ताहिकातून मराठी भाषेच्या विकासाबद्दल सांगितले.

लक्षमणराव फाटक यांनी १९२० मध्ये ‘निजाम विजय’ हैद्राबादहून सुरु केले. आ.कृ. वाघमारे यांनी १० फेब्रुवारी १९३७ मध्ये ‘मराठवाडा’ साप्ताहिकाची सुरुवात केली.

०६. १९३७ साली “निजाम प्रांतीय मराठी साहित्य परिषद” स्थापन झाली. या परिषदेचे पहिले अधिवेशन १ ते ३ ऑक्टोबर १९३७ मध्ये दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हैद्राबाद येथे झाले.

दुसरे अधिवेशन २८ ते ३० सप्टेंबर १९४३ मध्ये दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे झाले. तिसरे अधिवेशन १९४४ मध्ये ग.त्र्य. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे झाले.

आर्य समाज

०१. स्वामी दयानंद सरस्वती यांनी १० एप्रिल १८७५ रोजी सर्वप्रथम मुंबई येथे ‘आर्य समाज’ या संघटनेची स्थापना केली.
पुढे १८८२ मध्ये आर्य समाजाच्या शाखेची हैदराबादच्या सुलतानबाजार येथे स्थापना झाली. बँरिस्टर विनायक कोरटकर हे आर्य समाजाचे अध्यक्ष होते.

०२. मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड, उदगीर, हिंगोली, परभणी व जालना येथे आर्य समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. परतूर, सेलू, तुर्काबाद, उंदरी, नवापुर व आडस येथे आर्य समाजाची मंदिरे स्थापन करण्यात आली.

०३. उदगीरचे भाई बन्सीलालजी यांनी उदगीरला आपले मुख्य कार्यालय उघडले. त्यांनी ‘वैदिक संदेश’ या नावाचे वृत्तपत्र सोलापूर येथून प्रसिद्ध केले. सोलापूर येथूनच ‘सुदर्शन’ हे आर्य समाजाचे मुखपत्र प्रकाशित होत होते.

धारूर येथील धारूर आर्य समाज या केंद्रानेही महत्वाची समाज जागृती केली. स्वामी दयानंदांच्या सिद्धांताचे ते प्रचार करीत. आर्य समाजाचे सर्वात पहिले गुरुकुल धारूर येथे १९०७ साली स्थापन झाले.

०४. स्वामी श्रद्धानंद १९०२ साली हैद्राबाद संस्थानात आले. ते आर्य समाजाचे सर्वश्रेष्ठ नेते होते. त्यांना महात्मा गांधी आपले मोठे भाऊ  मानत असत.

स्वामी श्रद्धानंदजींनी समाज जागृतीसाठी ७ डिसेंबर १९३४ रोजी हैद्राबादला ‘वैदिक आदर्श’ हे साप्ताहिक सुरु केले व त्याची जबादारी ‘पंडित नरेंद्र’ यांच्यावर सोपविली.
विलीनीकरण

०१. मुघल साम्राज्याच्या विघटनाच्या कालखंडात हैद्राबाद संस्थानचा उदय झाला. हे संस्थान भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. या संस्थानामध्ये मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणा यांचा समावेश होता.

हैद्राबाद संस्थानचे क्षेत्रफळ ८२,३१३ चौ.मैल. होते तर लोकसंख्या १,६३,३८,५४३ एवढी होती. 

०२. हैदराबाद संस्थानातील प्रजेमध्ये लोकजागृती करण्याचे आणि तेथील नागरिकांना मूलभूत अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे कार्य स्वामी रामानंद तीर्थ यांसारख्या नेत्यांनी केले.

राष्ट्रीय सभेच्या चळवळीचा प्रभाव हैदराबादमधील स्वातंत्र्यप्रिय जनतेवर पडला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदराव नानल यांसारख्यांनी पुढाकार घेऊन १९३८ साली ‘हैदराबाद स्टेट काँग्रेस’ या संघटनेची स्थापना केली होती. 

०३. त्यांच्या सदस्यांनी सत्याग्रहाची चळवळ केली. त्यात शेकडो विद्यार्थी सामील झाले. १९४२ च्या ‘छोडो भारत’ चळवळीच्या काळात तशीच चळवळ हैदराबाद संस्थानातही झाली.

या चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर गोविंदभाई श्रॉफ़, रामलिंग स्वामी, अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू इत्यादींनी केले.

०४. भारताचे स्वातंत्र्य जसजसे जवळ येऊ लागले तसतशी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची चळवळ प्रखर होऊ लागली. हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले जावे असा ठराव जुलै १९४७ मध्ये या संघटनेने केला.

निजामाला मात्र स्वतंत्र राहायचे होते. त्याला पाकिस्तानची फुस होती.

०५. हैद्राबाद संस्थानचा नबाब मीर उस्मान अली खान याने पाकिस्तानच्या चिथावणीने हैद्राबाद संस्थान स्वतंत्र ठेवण्याचे जाहीर केले. एवढयावरच न थांबता संस्थानाच्या सीमा विस्तारासाठी लष्करी तयारीस सुरवात केली.

०६. सरदार पटेल यावेळी म्हणाले कि, “जे भारतीय संघराज्य आम्ही आमचे रक्त सांडून मिळवले आहे. त्याच्या मध्यभागी असे एखादे अलग राज्य आम्ही सहन करणार नाही”

०७. सरदार पटेलांनी जनरल माउंटबॅटन यांना या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली. भारत सरकार आणि निजाम यांच्यामध्ये २९ नोव्हेबर १९४७ रोजी जैसे थे करार झाला.

यामूळे लॉर्ड माऊंटबॅटनला वाटाघाटीसाठी वेळ मिळणार होता. निजामाने जनरल माउंटबॅटनचा मित्र वॉल्टर मॉक्टन यास आपला वकील म्हणून वाटाघाटीसाठी पाठविले.

०८. निजामाने हैद्राबाद पाकिस्तानशी जोडली जाणार नाही असे गुप्तरित्या कळविले. हैद्राबाद संस्थानास वसाहतीचा दर्जा देण्याची विनंती त्याने ब्रिटिश सरकारला केली. परंतु ब्रिटनने निजामाच्या विनंतीस नकार दिला.

०९. निजाम आणि भारत सरकार यांच्यातील वाटाघाटीत अडथळा आणण्याचा प्रयत्न ‘मज्लिस ए इत्तेहाद-उल-मुस्लीमीन’ नावाच्या कट्टर धर्मनिष्ठ मुस्लीम संघटनेचा नेता कासीम रझवी करत होता. निजामानेही जैसे थे परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या. कासीम रिझवीच्या माध्यामातून रझाकार या निमलष्करी दलाची निर्मिती केली.

१०. हैद्राबाद कॉंग्रेसने ७ ऑगस्ट १९४७ पासून निजामाने लोकप्रतिनिधिंचे सरकार नेमावे यासाठी सत्याग्रह सुरु केला. वीस हजारांहून जास्त सत्याग्रहींना निजाम सरकारने तुरुंगात टाकले.

यामूळे रझाकार या निमष्करी दलाने संस्थानातील प्रजेवर भयंकर स्वरूपाचे अन्याय, अत्यायार केले. त्यामुळे तेथील जनतेने भारतीय हद्दीत आसरा घेतला. सीमेवरील ७१ खेडी उदध्वस्त केली. तर १४० वेळा भारतीय प्रदेशावर आक्रमण केले.

११. कासीम रझवी हा धर्मांध व उद्दाम होता. त्याच्या साथीदारांनी हिंदूंवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणार्‍या मुस्लिमांवरही अनन्वित अत्याचार केले. रझाकारांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. प्रतिकारासाठी प्रजेनेही शस्त्र हाती घेतले.

१२. हैद्राबाद संस्थानातील तेलंगणा भागात १९४६ च्या उत्तरार्धात कम्युनिस्ट प्रणीत शेतकरी आंदोलन घडून आले होते. पण नंतर रझाकारांच्या दबावामुळे ते काही काळ बंद पडले होते.

हैद्राबाद मुक्ती आंदोलनामुळे शेतकरी आंदोलनाला जोर चढला. रझाकारांच्या अन्याय अत्याच्याराचा सामना करण्यासाठी त्यांनी ‘शेतकरी संरक्षक दला’ची निर्मिती केली व या दलाच्या माध्यामातून जमीनदारांवर हल्ले केले.व त्यांच्या ताब्यातील जमीनी शेतकरी व भूमिहिन यांना वाटून दिल्या.

१३. निजामाने वाटाघाटीत चालविलेली चालढकल पाहून सरदार पटेल संतापले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरदार पटेलांनी पंतप्रधानांना कळविले की, कोणत्याही परिस्थितीत हैद्राबादचे विलीनीकरण करून तेथे प्रतिनिधी सरकार स्थापन केले पाहिजे.

शेवटी भारत सरकारने हैदराबादेत शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलीस कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

१४. यानुसार १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादमध्ये लष्करी कारवाई करण्यात आली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी लेफ्टनंट जनरल महाराज राजेंद्र सिंहजी यांच्या मार्गदर्शनाखाली व मेजर जनरल जे. एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरु झाली. तीन दिवसांत निजाम शरण आला. १८ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद ताब्यात आले.

१५. निजामाबाबत काहीसे सौम्य धोरण स्वीकारून त्यास राजप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याला ५० लाखांचा वार्षिक तनखा देण्यात आला. त्याची अगणित संपत्ती त्याच्याकडेच ठेवण्यात आली.

१६. १९४९ मध्ये एस.के. बेलोदी या आय.सी.एस. अधिकार्‍याने निवडणूका घेतल्या. तेथे  कॉग्रेस सरकार सत्तेवर आले. सरदार पटेलांच्या खंबीर नेतृत्वामुळे संस्थाने विलीनीकरणाचे प्रश्न मार्गी लागले. म्हणून सरदार पटेलांना पोलादी पुरुष किंवा लोहपुरुष असे म्हटले जाते.

संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
वसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
विलीनीकरण : सिक्कीम व चंद्रनगर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
विलीनीकरण: हैदराबाद, जुनागड, काश्मीर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.