इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग ३

चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध (१७९९)

०१. तिसऱ्या  इंग्रज-म्हैसूर युद्धामुळे टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी झाले होते. श्रीरंगपट्टणमच्या तहाने त्याच्यावर लादलेली युद्धखंडणीची प्रचंड रक्कम त्याने प्रामाणिकपणे व नियमितपणे चुकती केली होती.त्याच्या ताब्यात जो प्रदेश शिल्लक उरला होता त्याच्या सरासरी वार्षिक महसूल उत्पन्नाच्या जवळजवळ तीनपट रक्कम खंडणी म्हणून त्याच्यावर लादण्यात आली होती.
०२. टिपूला देता येऊ नये इतकी मोठी ही रक्कम होती, तरीही ही देणी टिपूने फेडली. ही रक्कम वसूल करण्यासाठी टिपूला त्याच्या प्रजेवर १.६० कोटी रुपयांची लेव्ही (जबरदस्तीने वसूल करण्यात येणारा कर) लादावी लागली. उर्वरीत रक्कम त्याला त्याच्या तिजोरीतून (१.१० कोटी रुपये) आणि सैन्याकडून (०.६० कोटी रुपये) जबरदस्तीने वसूल करण्यात आलेल्या भेटवस्तू व नजराण्यातून भरावी लागली. याला ब्रिटिशांनी त्याच्यावर लादलेली जबरदस्त खंडणी कारणीभूत होती.
०३. तहाच्या अटी पूर्ण केल्यानंतर आणि स्वतःच्या दोन्ही अल्पवयीन मुलांची सुटका केल्यानंतर टिपूने संपूर्णपणे तटस्थतेच्या धोरणाचा अंगिकार केला. त्याने त्याची सगळी शक्ती युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याकरीता वापरण्यास सुरुवात केली. टिपूने त्याच्या पायदळात नवीन सैनिकांना सामील करून त्यांना शिस्त व लष्करी प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी फ्रेंच लष्कराधिकारी नियुक्त केले. याच कालावधीत त्याने श्रीरंगपट्टणम या त्याच्या राजधानीला तटबंदी करण्यास प्रारंभ केला.

 

०४. १७९६ मध्ये म्हैसूरच्या वोडीयार राजाचा मृत्यू झाला. टिपुने राजाच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसविण्याच्या ऐवजी स्वतःलाच सुलतान म्हणून घोषित केले. पण राजाच्या मुलाला निवृत्तीवेतन सुरु ठेवले.

०५. टिपूने ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी मित्रपक्षांच्या शोधासाठी १७९६ मध्ये आपले दूत अरेबिया, कॉन्स्टॅन्टिनोपल आणि काबूल येथे पाठविले आणि मराठे व ब्रिटिश यांच्याविरूद्धच्या लढ्यासाठी त्यांची मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले.

०६. टिपूने फ्रेंचांशी मैत्रीपूर्ण संबंध राखलेले होते. टिपूने त्यांना स्वतःच्या राज्यात व्यापार करण्याची परवानगी दिलेली नव्हती. मात्र स्वतःच्या सैन्यात भाडोत्री सैनिक म्हणून फ्रेंचांना भरती करून घेतलेले होते.
०७. फ्रान्समध्ये सप्टेंबर १७९२ मध्ये राजेशाहीचा शेवट झाल्यानंतर फ्रेच-इंग्रज वैर अधिकच उफाळून आले. फ्रेंचही इंग्रजांच्या विरोधात मित्रांच्या शोधात असल्याने टिपू सुलतानही ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उघडण्यासाठी त्यांना मदत करण्यास तयार होता पण त्यापूर्वी फ्रेंचांनी दहा हजार सैनिकांची फौज दक्षिणेत उतरवावी ही टिपूची अट होती. १७९६ साली टिपूने त्याचा एक दूत मॉरीशसचा फ्रेंच गव्हर्नर जनरल मॅलार्टिककडे पाठवला.

०८. टिपूने त्याच्या लष्करातील भाडोत्री फ्रेंच सैनिकांना खूष करण्यासाठी १५ मे १७९७ रोजी श्रीरंगपट्टणम येथे जॅकोबिन क्लबची स्थापना केली. तेथे फ्रेंच गणराज्याचा ध्वजही फडकविण्यात आला व २३०० तोफांची सलामी देण्यात आली.

०९. ३० जानेवारी, इ.स. १७९८ रोजी फ्रेंच गव्हर्नरने एक जाहिरनामा प्रस्तुत केला. त्यात तो टिपू सुलतान फ्रेंचांसोबत एक आक्रमक आणि संरक्षणात्मक करार करू इच्छितो. त्यासाठी तो आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन देतो.

१०. त्यावेळी लष्करी जबाबदारी स्विकारण्याची फ्रेंच सरकारची तयारी नव्हती तरीही मॅलार्टिकच्या जाहिरनाम्याला प्रतिसाद म्हणून टिपूच्या ब्रिटिशविरोधी अभियानासाठी ९९ लढाऊ फ्रेंच सैनिकांची एक तुकडी मंगलोरला रवाना करण्यात आली.

११. १७९८ मध्ये गवर्नर जनरल म्हणून वेलस्ली आला. तो साम्राज्य वाढविण्याच्या मनोवृत्तीचा होता. त्याने टिपूचा काटा काढायचा हे ठरविले. कारण टिपूने नेपोलियनशी संपर्क ठेऊन त्याला भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते.
१२. वेलस्लीने टिपू सुलतानला ८ नोव्हेंबर १७९८ रोजी अत्यंत कडक शब्दात एक पत्र लिहिले. त्यात त्याने ब्रिटिशांचे कट्टर शत्रू असलेल्या फ्रेंचांशी टिपूची जी गुप्त खलबते चालू आहेत त्याबद्दल त्याला जाब विचारला. टिपूने त्याचे फ्रेंचांशी असलेले सर्व संबंध तोडावेत व त्याच्या लष्करातील भाडोत्री फ्रेंच अधिकाऱ्याना व विदेशी लोकांना रजा द्यावी तसेच हैदराबादच्या निजामाप्रमाणे कंपनीशी तैनाती फौजेचा करार करावा असेही टिपूला कळविण्यात आले.

१३. टिपूची फ्रेंचांशी चालू असलेली गुप्त खलबते म्हणजे त्याने कंपनीशी केलेल्या तहाचा भंग असून ते ब्रिटिशविरोधी प्रतारणेचे प्रतीक आहे असेही वेलस्लीने टिपूला पत्रातून खडसावून सांगितले. टिपूने फ्रेंचांशी असलेले संबंध तोडल्याचा पुरावा म्हणून त्याने त्याचा समुद्रकिनाऱ्यालगतचा भूप्रदेश कंपनीच्या हवाली करावा अशी गळ घालून त्यासाठी बोलणी करण्यासाठी वेलस्लीने मेजर जॉन डोव्हेटनला स्वतःचा दूत म्हणून नियुक्त केले.

१४. या पत्राला टिपूकडून कोणतेही उत्तर येण्याच्या आतच गव्हर्नर जनरल असलेल्या वेलस्लीने टिपूच्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश नौसेनाला सज्ज राहण्यास सांगितले व टिपूविरुद्धच्या मोहिमेचे मार्गदर्शन करण्यासाठी तो स्वतः कोलकात्याहून मद्रासला आला.

१५. तिथे आल्यावर ३१ डिसेंबर १७९८ रोजी त्याला टिपूचे पत्र मिळाले. टिपूने वेलस्लीला पाठविलेल्या या पत्रात उडवाउडवीची उत्तरे दिलेली होती. ९ जानेवारी १७९९ रोजी वेलस्लीने टिपूला पुन्हा एक सविस्तर पत्र लिहिले व पत्र मिळताच २४ तासाच्या आत त्याच्या संपूर्ण शरणागतीची मागणी केली. अर्थात हे पत्र म्हणजे युद्धाचीच धमकी असल्याने टिपू त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही.

१६. वेलस्लीने टिपूवर आरोप लावला कि तो मराठे व निजामाला बरोबर घेऊन इंग्रजांविरुद्ध कारस्थान करीत आहे. तसेच अरबस्थान, अफगाणिस्थान, तुर्कस्थान, मॉरीशस आणि थेट फ्रान्समधील संचालक मंडळाशी पत्रव्यवहार करून इंग्रजांविरुद्ध मोठे संघटन करीत आहे.

१७. त्यामुळे वेलस्लीने एप्रिल १७९९ मध्ये टिपूविरुद्ध मोहीम सुरु केली. निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार केल्याने तोही इंग्रजासोबत होता. इंग्रज सेनानीमध्ये गवर्नर वेलस्लीचा भाऊ आर्थर वेलस्लीसुद्धा होता. मराठ्यांना टिपुच्या प्रदेशापैकी अर्धा भाग देण्याचे वचन देऊन त्याने या संघर्षात मराठ्यांना तठस्थेची भूमिका घेण्यास राजी केले.

१८. इंग्रज आपल्यावर हल्ला करतील हे कळून चुकल्यावर टिपूने हल्ल्याविषयी आडाखे बांधण्यास व हल्ल्याचा प्रतिकार करण्याची तयारी सुरु केली. इंग्रज मद्रासहून हल्ला करतील असा टिपूचा अंदाज होता त्यामुळे त्याने प्रतिकाराची तयारी म्हणून त्याच्या ताब्यातील उ्त्तरेकडील हिरवागार प्रदेश प्रथम जाळून उद्ध्वस्त केला ज्यायोगे त्या भागातून येणाऱ्या इंग्रज फौजेला गवताची काडीही मिळू नये असा टिपूचा उद्देश होता. हा प्रदेश उद्ध्वस्त करण्यात टिपूने दोन आठवडे घातले.

१९. ब्रिटिशांनी सुरुवातीलाच टिपूचा हा डाव हाणून पाडला. ब्रिटिशांनी मद्रासच्या बाजूने आक्रमण न करता टिपूच्या प्रदेशाच्या दक्षिणेकडील बाजूने दोन भिन्न मार्गांनी सैन्याच्या दोन तुकड्या पाठवून आक्रमण केले. एका मुख्य तुकडीचे नेतृत्व जनरल हॅरीसकडे तर दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व जनरल स्टुअर्टकडे होते.
२०. ब्रिटिशांची मुख्य फौज जिचे नेतृत्व जनरल हॅरीसकडे होते ती ११ फेब्रुवारी १७९९ रोजी वेल्लोरहून निघाली व तिने पूर्वेकडून म्हैसूरवर आक्रमण केले. ब्रिटिशांची दुसरी फौज जनरल स्टुअर्टच्या नेतृत्वाखाली मुंबईहून २१ फेब्रुवारी १७९९ला निघून कन्नूर मार्गे पुढे सरकली व पश्चिमेकडून म्हैसूरवर हल्ला केला. हैदराबादच्या निजामाची दहा हजारची सेना ऑर्थर वेलस्लीच्या नेतृत्वाखाली जनरल हॅरीसच्या मुख्य सेनेला टिपूच्या मुलुखात प्रवेश करण्यापूर्वी ५ मार्च १७९९ रोजी येऊन मिळाली.

 

२१. सुरुवातीला टिपूची गाठ श्रीरंगपट्टणमच्या पश्चिमेला सडासीर येथे मुंबईहून येणाऱ्या फौजेशी पडली. तिथे टिपूने जनरल स्टुअर्टच्या फौजेवर हल्ला केला. स्टुअर्टने टिपूचा हा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यावेळी टिपूचे एक हजार सैनिक मृत पावले वा जखमी झाले.

२२. पूर्वेक़डून येणारी हॅरीसची फौज स्टुअर्टच्या फौजेला येऊन मिळण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी टिपूने आपला मोर्चा पूर्वेकडे वळवला. परंतु श्रीरंगपट्टणमपासून तीस किलोमीटरवर असलेल्या मालावली याठिकाणी त्याचा पराभव झाला. त्यामुळे टिपुला राजधानी श्रीरंगपट्टनम पर्यंत माघार घ्यावी लागली.
२३. त्याचा माग काढत ब्रिटिश सेना ५ एप्रिल १७९९ रोजी श्रीरंगपट्टणमपासून तीन किलोमीटर अंतरावर पोहोचली. या सेनेला नंतर जनरल स्टुअर्टचीही फौज येऊन मिळाली. इंग्रज फौजेने ७ एप्रिल १७९९ रोजीच श्रीरंगपट्टणला वेढा दिला. यानंतर जवळपास महिनाभर श्रीरंगपट्टणम किल्ल्याला वेढा घालण्यात आला होता.
२४. शेवटी टिपुने शरणागती पत्करायची ठरवून तहाची तयारी केली.इंग्रजांनी टिपूसमोर अपमानजनक व अशक्यप्राय अटी ठेवल्या. अभिमानी असलेल्या टिपुने शूरपणे त्या अटी अमान्य केल्या. इंग्रजांनी तत्काळ श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यावर जबरदस्त मारा केला.
२५. ४ मे१७९९ रोजी ब्रिटिश फौजांनी श्रीरंगपट्टणम किल्ल्यावर अंतिम हल्ला केला. किल्ल्याच्या एका भिंतिजवळ ब्रिटिश तोफखाना उभारण्यात आला होता. ४ मेच्या पहाटे ब्रिटिश सैनिक खंदकात दडून बसले व दिवस वर येईपर्यंत वाट पाहत राहिले आणि सूर्य मध्यान्ही आला असताना त्यांनी अचानक किल्ल्ल्यावर हल्ला केला.

२६. दिवस मावळताना हल्ला होईल ही टिपूची अपेक्षा असल्याने टिपूचे सैन्य दुपारचे भोजन करण्यात आणि विश्रांती घेण्याच्या तयारीत असल्याने ते या हल्ल्यासाठी पुरेसे तयार नव्हते.

२७. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंदकात दडून बसलेल्या ब्रिटिश सैनिकांनी खंदकाच्या बाहेर येऊन तोफखान्याच्या संरक्षणाखाली कावेरीचे खडकाळ पात्र पार करून श्रीरंगपट्टणम किल्ल्याच्या समोरचा खंदक पार करुन हल्ला चढवला. टिपूच्या राजवाड्यातून काही काळ प्रतिकार चालू राहिला पण लवकरच किल्ल्यातील दारूगोळा संपल्याने प्रतिकार थंडावला.

२८. दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास इंग्रजांचा निर्णायक विजय झाला. अखेर पराक्रमाची शर्थ करीत ४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान मारला गेला. बंदुकीच्या गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण झाली होती. टिपूचा मृतदेह किल्ल्याच्या पाणदरवाज्यात प्रेतांच्या ढिगाऱ्यात आढळला. त्याचे बहुतेक सेनानी किल्ल्याचे संरक्षण करीत असताना मारले गेले. किल्ल्यात जे जिवंत आढळले त्यांना क्रूरपणे मारण्यात आले. श्रीरंगपट्टणम शहर विजयी सेनेने लुटले.
२९. दुसऱ्या दिवशी टिपूच्या कुटुंबियांनी त्याचे शव ओळखले त्या शवाचे लष्करी इतमामाने दफन करण्यात आले. टिपू हा मृत झाला आहे हे सर्वांना कळावे या हेतूनेच इंग्रजांनी टिपूच्या शवाला सन्मान दिला. टिपूच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना कैद करण्यात आले परंतु कत्तल केलेल्या त्याच्या सेनाधिकाऱ्याच्या कुटुंबांना सौजन्याची वागणूक देण्यात आली. टिपूचा संपूर्ण खजिना आणि किल्ल्यातील त्याची मालमत्ता विजेत्या सैनिकांमध्ये वाटण्यात आली.

 

३०. टिपुची ३३ वर्षाची राजवट संपून म्हैसूर राज्याचे स्वातंत्र्य संपुष्टात आले. टिपुचा मुलगा इंग्रजांना शरण आला. म्हैसूरचे एक छोटेसे राज्य ठेऊन ते वाडियार घराण्यातील कृष्णराज ह्यांस देण्यात आले. तो अल्पवयस्क असल्याने त्याच्या सहाय्यासाठी टिपूचाच गद्दार इंग्रज समर्थक दिवाण पुर्णय्या यास रीजंट म्हणून ठेवण्यात आले. म्हैसूरने तैनाती फौज पद्धतीचा स्वीकार केला. या फौजेचा खर्च म्हणून वार्षिक २१ लाख रुपये देण्याचे मान्य केले.३१. त्यानंतर श्रीरंगपट्टमच्या तहानुसार किनारपट्टीसह संपूर्ण कॅनरा, कन्नड, कोईमतूर , वायनाड, धारपूरम, श्रीरंगपट्टम शहर, श्रीरंगपट्टनमचा बेटवजा किल्ला व म्हैसूरचा सागरी किनारा इंग्रजांनी आपल्या राज्यात विलीन केला. मलबार किनाऱ्यापासून कोरोमंडळ तटापर्यंत सलग प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यामुळे दक्षिण टोकाला इंग्रजांच्या सीमा पूर्व व पश्चिम सागराना भिडल्या.

३२. म्हैसूरच्या वायव्येकडील गुत्ती आणि गुरमकोंडा व चितळदुर्ग जिल्ह्याचा काही प्रदेश निजामाला मिळाला. पुढे १८०० मध्ये तैनाती फौजेचा खर्च म्हणून हा सर्व प्रदेश निजामाने इंग्रजांना दिला. ह्या युद्धात पेशव्याने इंग्रजांना मदत केली नाही. तरीही त्याला हरफनहल्ली व स्कोंडा प्रदेश देऊ केला. पण त्याला पेशव्याने नकार दिल्याने इंग्रज व निजाम ह्यांनी तो प्रदेश आपसात वाटून घेतला.

३३. वेलस्लीच्या यशाचे इंग्लंडमध्ये कौतुक करण्यात आले आणि त्याला आयर्लंडच्या परंपरेतील मार्क्विस या उपाधीने सन्मानित करण्यात आले. त्याला ईस्ट इंडिजमधील संपूर्ण ब्रिटिश फौजेचा सरसेनानीही करण्यात आले. त्याला रोख एक लाख पौंडसुद्धा देण्यात आले परंतु त्याने ते नम्रपणे नाकारल्याने त्याला वार्षिक पाच हजार पौंड असे वीस वर्षे देण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला.

३४. जनरल हॅरिसला बॅरन या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या लष्करी मोहिमेत सहभागी झालेल्या सगळ्याच लष्करी व्यक्तींना रोख पारितोषिके, नोकरीत पदोन्नती, आणि राजकीय उपाधी यांनी गौरविण्यात आले. आर्थर वेलस्लीला सात हजार पौंड रोख, शिवाय बाराशे पौंड किंमतीचे जवाहिर मिळाले.